पातुर | ग्रामीण प्रतिनिधी
पातुर तालुक्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे उष्णतेचा तीव्र कहर जाणवत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दि. २९ एप्रिल ते १२ मे दरम्यान तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन व नागरिक संरक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, घरातील दरवाजे व खिडक्या उघड्या ठेवून वायुवीजन ठेवावे, पुरेसे पाणी प्यावे, तसेच दही, ताक, लिंबू सरबत यांसारख्या थंड पेयांचा वापर करावा. तसेच मोबाइलचा वापर कमी ठेवावा, गॅस सिलेंडर उन्हात ठेवू नये आणि वीज मीटरवर जास्त भार टाकणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सतत वाढणाऱ्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





