खंडेश्वर (प्रतिनिधी):
तालुक्यातील दाभा गावात मागील १५ ते २० दिवसांपासून शासकीय नळयोजनेचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नळयोजनेला २०दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो. गेल्या कित्येक वर्षांपासून लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून, विशेषतः महिलांना लांब अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत आहे.
गावात उपलब्ध असलेले पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोटाचे विकार व इतर आजारांचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय, शासनाच्या योजनेअंतर्गत बसविण्यात आलेले वॉटर एटीएम देखील काही दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे.
ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पंचायत समिती, खंडेश्वर येथे धाव घेत लेखी निवेदन सादर करून तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच गावाला लागून असलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याची टंचाई अधिकच तीव्र झाली असून, याचा सर्वाधिक फटका महिलांना बसत आहे. “लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यासाठी सीमा मेटेकर, सोनाली ग्रेसपुंजे, मालती ग्रेसपुंजे, ज्योती कुकडकर, मनिषा ग्रेसपुंजे या महिलांनी पुढाकार घेऊन गावातील महिलांच्या सह्यांचे निवेदन गट विकास अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांना देण्यात आले.






