श्रीगोंदा (प्रतिनिधी) – ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, १ मे २०२६ पासून हॉटेल व खाद्यव्यवसायिकांना पनीर आणि “चीज अॅनालॉग” याबाबत स्पष्ट माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मार्च २०२५ मध्ये विधानमंडळात पनीर संदर्भातील प्रश्न उपस्थित करत हा मुद्दा चर्चेत आणला होता. ग्राहकांची दिशाभूल होऊ नये यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
यानंतर राज्य शासनाने मार्च २०२६ मध्ये निर्णय घेत, १ मेपासून पनीर आणि चीज अॅनालॉग (दिसायला सारखे पण वेगवेगळे पदार्थ) यामधील फरक स्पष्टपणे नमूद करणे अनिवार्य केले आहे. हॉटेल मालकांनी मेनू कार्ड किंवा सूचना फलकाद्वारे ही माहिती ग्राहकांना सहज समजेल अशा पद्धतीने दर्शवणे आवश्यक राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी ग्राहकांना आवाहन केले आहे की, हॉटेलमध्ये जेवण करताना संबंधित पदार्थांची माहिती आधी घ्यावी. तसेच काही शंका असल्यास ग्राहकांनी 1800-11-2100 या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवावी.
या निर्णयामुळे ग्राहकांना पारदर्शक माहिती मिळून फसवणुकीला आळा बसणार असल्याचे मानले जात आहे.








