सेलू (प्रतिनिधी) : तालुक्यातील अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला असून, १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी याबाबत माहिती देत नागरिकांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
शासनाच्या धोरणानुसार, अतिक्रमित जागेतील ५०० चौ. फूट क्षेत्र विनामूल्य देण्यात येणार असून, त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी शासकीय बाजारमूल्यानुसार सुमारे १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही नियमितीकरण प्रक्रिया कमाल १५०० चौ. फूट पर्यंत लागू राहणार आहे. यापेक्षा जास्त जागा अतिक्रमित असल्यास ती शासकीय ताब्यात घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तहसीलदार पाराजे यांनी सांगितले की, पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावा. ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी तर शहरी भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला घरांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून शेकडो कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, ५०० चौ. फूटपेक्षा जास्त जागेसाठी भराव्या लागणाऱ्या रकमेबाबत काही नागरिकांमध्ये संभ्रम व चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ही प्रक्रिया पारदर्शक व जलदगतीने राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.







