देगलूर | विशेष प्रतिनिधी :
बिलोली-देगलूर परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपसा आणि आंतरराज्यीय तस्करीने आता उग्र रूप धारण केले आहे. गेल्या ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसूनही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने संतप्त झालेले मनसेचे तालुकाध्यक्ष मनमथ सूर्यकांत परबते यांनी आता ‘कारवाई करा, नाहीतर जीव देऊ’ असा आक्रमक पवित्रा घेतला आहे . विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे .
नेमके प्रकरण काय?
महाराष्ट्र-तेलंगणा-कर्नाटक या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात हायवा गाड्यांद्वारे अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या गाड्या क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) भरल्या जात असून, यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने, प्रशासनाचे रेती माफियांशी साटेलोटे आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
उपोषणाचा पाचवा दिवस,
प्रकृतीकडे दुर्लक्ष?
मनमथ परबते गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, अद्याप एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांची भेट घेऊन ठोस आश्वासन दिलेले नाही. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे रेती माफियांचे मनोबल अधिकच वाढले असून, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
हायवा गाड्यांची चौकशी: अवैध रेती वाहतूक करणाऱ्या सर्व हायवा गाड्यांची सखोल चौकशी व्हावी.
ब्लॅकलिस्टची कारवाई: नियम मोडणाऱ्या वाहनांना कायमस्वरूपी काळ्या यादीत (Blacklist) टाकावे.
दोषी अधिकाऱ्यांवर टांगती तलवार: रेती माफियांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने विभागीय कारवाई करण्यात यावी.
शाश्वत बंदी : सीमावर्ती भागातील अवैध रेती वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी.
प्रशासनाला शेवटचा अल्टिमेटम
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना दिलेल्या निवेदनात परबते यांनी स्पष्ट केले आहे की, जर येणाऱ्या काही दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. या संभाव्य घटनेची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
” प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. रेती उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे आणि महसूलही बुडत आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत *मी माघार घेणार नाही.”
— *मनमथ सूर्यकांत परबते ( तालुकाध्यक्ष, मनसे )
आता या गंभीर इशाऱ्यानंतर तरी कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन जागे होणार का? की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .







