शहादा, दि. 03 (प्रतिनिधी):
शहादा येथील प्रशिक बुद्ध विहारात दि. १ मे रोजी वैशाखी बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जगाला शांती व समतेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वैशाखी पौर्णिमेला बौद्ध धर्मात विशेष महत्त्व असून याच दिवशी सिद्धार्थ गौतमांचा जन्म, सम्यक संबोधी प्राप्ती आणि महापरिनिर्वाण झाले. या तीनही पवित्र घटनांमुळे हा दिवस ‘त्रिगुणी पौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्धांना पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांना ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बौद्धाचार्य संजय निकम यांनी उपस्थितांना सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करून दिले.
प्रशिक बुद्ध विहार, प्रज्ञा प्रतिष्ठान व जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच समाज बांधवांसाठी भोजनदान व खिरदानाचेही आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रघुनाथ बळसाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.











