नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप)ने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारपर्यंत निकालांचे स्पष्ट चित्र समोर आले.
पश्चिम बंगाल मध्ये भाजपने तृणमूल काँग्रेस ला मोठा धक्का देत सत्तांतर घडवून आणले. भाजपने तब्बल १९० जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला ९४ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि डाव्या पक्षांची येथे मोठी पिछेहाट झाली.
आसाम मध्ये भाजपने ९७ जागांसह सत्ता कायम राखली असून पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुद्दुचेरी मध्येही भाजपने २२ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले.
दरम्यान, तामिळनाडू मध्ये मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. अभिनेता विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्ष ने १०९ जागा जिंकत द्रमुक आणि अण्णाद्रमुक या प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का दिला आहे.
केरळ मध्ये दीर्घकाळ सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा बालेकिल्ला अखेर कोसळला असून काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडीने ९८ जागांसह बहुमत मिळवले आहे.
या निकालांमुळे भाजपची राष्ट्रीय स्तरावरील ताकद अधिक बळकट झाली असून आगामी काळात पक्षाची आक्रमक रणनीती दिसून येण्याची शक्यता आहे. या निकालांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले असून देशाच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी मानली जात आहे.









