सिरसाळा (प्रतिनिधी) : सिरसाळा येथील राजवीर पेट्रोलियम (HP पेट्रोल पंप) येथे इंधन टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले असून ग्राहकांना केवळ ३०० रुपयांचेच पेट्रोल देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंपावर पेट्रोलचा पुरेसा साठा नसल्याचे कारण देत व्यवस्थापनाकडून इंधन विक्रीवर मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, सिरसाळा परिसरातील अनेक नागरिकांना रोजच्या कामासाठी लांब अंतराचा प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत केवळ ३०० रुपयांचे पेट्रोल देण्याच्या निर्णयामुळे त्यांचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
पंपावर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून तासनतास प्रतीक्षा करूनही पूर्ण टँक पेट्रोल मिळत नसल्याने वादाचे प्रसंग घडत आहेत. उन्हात उभे राहूनही समाधानकारक सेवा न मिळाल्याने ग्राहकांमध्ये संताप वाढत आहे.
“आम्हाला दूरच्या गावी जायचे आहे, पण ३०० रुपयांच्या पेट्रोलमध्ये गाडी अर्ध्या रस्त्यातच बंद पडण्याची भीती आहे. पंपावर विचारणा केली असता साठा कमी असल्याचे सांगितले जाते,” अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने व्यक्त केली.
दरम्यान, इंधनाचा तुटवडा नेमका कशामुळे निर्माण झाला आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पेट्रोल पंप व्यवस्थापनाची पुढील भूमिका काय असेल आणि ही समस्या कधी सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








