अक्राणी (प्रतिनिधी) – दि. ५ मे २०२६
नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या कराव्यात, अशी ठाम मागणी विविध आदिवासी संघटनांनी केली आहे. यासंदर्भात विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक यांना निवेदन सादर करण्यात आले.
बिरसा फायटर्स, भारत आदिवासी संविधान सेना, राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद भारत, आदिवासी युवा संघटना, आदिवासी युवा सेना आदी संघटनांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. या वेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, कार्याध्यक्ष रविंद्र वळवी, महासचिव रोहीदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, तालुका अध्यक्ष अजय वळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार (शहादा), गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची मागणी करण्यात आली आहे.
संघटनांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, काही पोलिस अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असून, निरपराध नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, सामाजिक कार्यकर्त्यांना लक्ष्य करणे, आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करणे, तसेच पत्रकारांवर दबाव टाकणे असे प्रकार घडत आहेत. याशिवाय अवैध धंद्यांना संरक्षण दिल्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढीस लागल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील गुन्हेगारीत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा संघटनांनी केला असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यास परिस्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या निवेदनामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









