त्वरीत उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी
पिपरी मेघे (ता. जि. वर्धा) | प्रतिनिधी
Pipri Meghe येथील ग्रामस्थांनी गावातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर केले आहे. सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात, नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जीवन प्राधिकरणामार्फत गावात पाणीपुरवठा केला जात असला तरी तो वर्षातून अनेक वेळा खंडित होतो. काहीवेळा तर एक ते दोन आठवडे किंवा पंधरवडाभर गावात पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांवर पाण्याअभावी संकटजन्य परिस्थिती निर्माण होत असून, पर्यायी पाण्याचा स्रोत नसलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, ग्रामपंचायत ही स्थानिक पाणीपुरवठा नियंत्रण समिती असल्याने जीवन प्राधिकरणाशी समन्वय साधून ही समस्या तातडीने सोडवावी.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या :
- वर्षभर नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा
- ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी
- वारंवार खंडित होणारा पुरवठा तातडीने सुरळीत करावा; अन्यथा टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे
- पाणीपुरवठ्याची वेळ ग्रामस्थांच्या सोयीप्रमाणे निश्चित करण्यात यावी
- जबाबदार नागरिकांची पाणीपुरवठा समितीवर नियुक्ती करण्यात यावी
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी निवेदन देताना Shubham Dhawale, मालाबाई कुत्तरमारे, Vandana Bhagat, Yogita Pille यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.










