सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असतानाच आता अधिक मासामुळे विवाह इच्छुकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. १७ मे २०२६ पासून पुढील तब्बल आठ महिने शुभमुहूर्तांच्या तारखांमध्ये खंड पडणार असल्याने अनेक कुटुंबांना लग्न समारंभ पुढे ढकलावे लागणार आहेत. परिणामी, आता अनेकांना थेट जानेवारी २०२७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक मासामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नाही. यंदा १७ मे ते १५ जून या कालावधीत अधिक मास असल्याने विवाह, गृहप्रवेश, साखरपुडा यांसारख्या मंगल कार्यांवर मर्यादा येणार आहेत.
याशिवाय, जुलै महिन्यापासून गुरू आणि शुक्र ग्रहांचा अस्त होणार असून त्यानंतर चातुर्मासाची सुरुवात होईल. धार्मिक मान्यतेनुसार या काळात विवाहासह सर्व शुभकार्ये वर्ज्य मानली जातात. पुढे ऑक्टोबर महिन्यात सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन असल्याने त्याचाही परिणाम विवाह मुहूर्तांवर होणार आहे.
या सर्व कारणांमुळे २०२६ मध्ये विवाहासाठी शुभमुहूर्तांचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, लग्नाची बोलणी सुरू असलेल्या कुटुंबांची चिंता वाढली आहे. अनेक मंडप, बँड, केटरिंग व इतर विवाह व्यवसायांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विवाह मुहूर्तांमध्ये खंड पडण्याची प्रमुख कारणे :
- १७ मे ते १५ जूनदरम्यान अधिक मास
- जुलैपासून गुरू-शुक्र ग्रहांचा अस्त
- चातुर्मासाची सुरुवात
- ऑक्टोबरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा
- पुढील प्रमुख विवाह मुहूर्त जानेवारी २०२७ मध्ये उपलब्ध
यामुळे विवाहासाठी तयारी करणाऱ्या कुटुंबांना आता नियोजन बदलावे लागणार असून, पुढील वर्षातील मुहूर्तांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.







