चिकलठाणा येथील शेतकऱ्याची नुकसानभरपाईची मागणी
सेलू, जि. परभणी | प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथे गट क्रमांक १८४ मधील शेतकरी वृंदावनी रानोबा थोंबाळ यांच्या शेतातील सौर ऊर्जा पॅनलचे ५ मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे सोलार पॅनलच्या प्लेट उडून गेल्या असून चार पाट्या तुटल्याची घटना घडली. या सौर यंत्रणेच्या माध्यमातून शेतातील पिकांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र पॅनलचे नुकसान झाल्याने सिंचन व्यवस्थेवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या मते, सौर ऊर्जा पॅनल हे शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून निघण्यासाठी प्रशासनाने पंचनामा करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
तसेच संबंधित शक्ती सोलर कंपनीने देखील शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.









