नवी मुंबई प्रतिनिधी
कोपरखैरणे आणि मुंबई पोलीस ठाण्यांमध्ये जबाबदारी ढकलली जात असल्याने एका पीडित महिलेची अवस्था “ना घर का, ना घाट का” अशी झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून कोपरखैरणे परिसरात वास्तव्यास असलेल्या या महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा तिचा आरोप आहे.
पीडितेने एफआयआर नोंदवण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. संबंधित अर्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते यांच्याकडे चौकशीसाठी आला; मात्र जबाब नोंदवूनही तो पुढील मान्यतेसाठी वरिष्ठांकडे न पाठवता प्रलंबित ठेवल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनंतर पीडित महिलेने कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांची भेट घेतली. मात्र, “हा प्रकार मुंबई हद्दीत येतो, तिथे जा” असे सांगण्यात आल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मुंबईतील संबंधित पोलीस ठाण्यात गेल्यानंतर “हा गुन्हा कोपरखैरणे हद्दीतला आहे, तिथेच तक्रार करा” असा सल्ला देण्यात आला. यामुळे पीडित महिला संभ्रमात सापडली असून न्यायासाठी धावपळ सुरूच आहे.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, हितेन झेवेरी नावाच्या व्यक्तीने विवाहाचे आमिष दाखवून दीर्घकाळ सहजीवन ठेवले आणि फसवणूक केली. २००२ ते २०२४ या काळात विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप तिने केला आहे.
दरम्यान, “झिरो एफआयआर” या तरतुदीनुसार कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवता येतो आणि पोलिसांनी तक्रार नाकारणे कायद्याचा भंग ठरतो. असे असताना संबंधित प्रकरणात पीडितेला एका ठाण्यातून दुसऱ्याकडे पाठवले जात असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकरणाची दखल पोलीस आयुक्तांनी घेतल्याची माहिती असून तपासासाठी पोलीस उपायुक्तांना निर्देश देण्यात आल्याचे समजते. पीडितेला न्याय कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








