आजरा : प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, तालुका अखेर टोलमुक्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या टोलविरोधी आंदोलन आणि चर्चेनंतर शुक्रवारी महामार्ग अधिकारी, टोल प्रशासन आणि टोल विरोधी समिती यांच्या संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
तहसीलदार समीर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्थानिक नागरिक तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोलमधून पूर्णपणे माफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
- स्थानिक नागरिकांना टोलमाफी
आजरा तालुक्यातील नागरिकांच्या खासगी चारचाकी वाहनांकडून टोल आकारला जाणार नाही. यासाठी वाहनाचे ‘MH-09’ पासिंग असणे आवश्यक राहणार आहे. इतर पासिंगच्या वाहनांसाठी संबंधित गावच्या सरपंचांचा दाखला सादर करावा लागणार आहे. तसेच आधारकार्ड, फास्टॅग आणि आरसी बुकची झेरॉक्स जमा करणे बंधनकारक राहील. - ऊस वाहतुकीस पूर्ण सूट
ऊस हंगामात कारखान्याकडे जाणाऱ्या ऊस वाहतूक वाहनांना पूर्ण टोलमाफी देण्यात आली आहे. संबंधित साखर कारखान्यांनी वाहनांची अधिकृत यादी टोल प्रशासनाला देणे आवश्यक राहणार आहे. - व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत
पिवळ्या नंबर प्लेटच्या व्यावसायिक वाहनांसाठी टोल प्रशासनाकडून ५० टक्के सवलतीचा मासिक पास उपलब्ध करून दिला जाणार आहे. - प्रलंबित कामे आठवड्यात पूर्ण करण्याचे आश्वासन
पंचायत समिती परिसरातील रस्त्यावर वाहणारे पाणी, गटारी दुरुस्ती, पथदिवे तसेच पश्चिम भागातील प्रलंबित कामे पुढील आठवडाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन टोल प्रशासनाने दिले.
१५ दिवसांनी पुन्हा होणार आढावा बैठक
सध्या टोल नाक्यावरील अंतर्गत कामांसाठी प्रशासनाला मुभा देण्यात आली असून, येत्या १५ दिवसांनंतर पुन्हा संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. त्यावेळी आश्वासन दिलेल्या कामांचा आढावा घेऊन टोल प्रत्यक्ष सुरू करायचा की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीत कॉ. संपत देसाई, नगरसेवक परशुराम बामणे, रविंद्र भाटले, प्रभाकर कोरवी, प्रकाश मोरुसकर, युवराज पोवार यांनी सक्रिय सहभाग घेत जनतेची बाजू प्रभावीपणे मांडली. यावेळी मुकुंद देसाई, राजू होलम, काशिनाथ मोरे, युवराज जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









