बारावी परीक्षेत ६०० पैकी ६०० गुण; मंत्री संजय राठोड यांच्याकडून सत्कार
नेर प्रतिनिधी :
कु. किमया शितल वातीले हिने बारावी परीक्षेत ६०० पैकी ६०० गुण मिळवत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला असून यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल मंत्री संजय राठोड यांनी तिच्या निवासस्थानी भेट देऊन सत्कार केला तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
किमयाच्या या यशामागे तिची जिद्द, अथक परिश्रम, आई-वडिलांचे संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हेच खरे बळ असल्याचे यावेळी मंत्री राठोड यांनी सांगितले. तिच्या यशामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.
यावेळी बोलताना कु. किमया वातीले म्हणाली, “मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियापासून दूर राहून एकाग्रतेने अभ्यास केला तर कोणतेही शिखर गाठता येते.”
किमयाच्या या ऐतिहासिक यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.











