मा. आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात घोषणाबाजी
कणकवली | प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल, सीएनजी व गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कणकवली येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
“कहा गये अच्छे दिन?” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कणकवली एसटी स्टॅन्ड ते पटवर्धन चौकापर्यंत पदयात्रा काढत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी “पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा”, “महागाईने जनता होरपळली” अशा आशयाचे फलक झळकवत निषेध नोंदविला.
यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. जर नागरिकांनी आताच आवाज उठवला नाही, तर भविष्यात आणखी मोठी दरवाढ होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
“पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिनचे आश्वासन दिले होते, ते आता कुठे गेले?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच मंत्री, खासदार आणि आमदार मोठमोठे ताफे घेऊन फिरत असताना सामान्य जनता मात्र महागाईच्या झळा सहन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या काळात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुका संघटक राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, तेजस राणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.










