आजरा | प्रतिनिधी
शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या सोमवारी (दि. १८) आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार पेरणोली (ता. आजरा) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. पेरणोली येथे पार पडलेल्या शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रशासनाकडून करण्यात येणारा जमिनीचा सर्व्हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
बैठकीत बोलताना कृती समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे परिसरातील कृषी संस्कृती, पर्यावरण आणि शेती व्यवस्था धोक्यात येणार असल्याची तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “हा महामार्ग फक्त जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण परिसरातील शेती व्यवस्थेलाच मोठा फटका देणारा आहे. सक्तीच्या भूसंपादनाला आमचा ठाम विरोध राहील.”
‘स्वाभिमानी’चे तानाजी देसाई यांनी प्रशासन पावसाळ्यापूर्वी घाईघाईने सर्व्हे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला. “शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून हा सर्व्हे रोखला पाहिजे. प्रशासनाच्या दबावाला बळी न पडता संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस परिसरातील शेतकरी आणि आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अमर सावंत, विठ्ठल मस्कर, सुभाष देसाई, हणमंत कळेकर, किरण गुरव, सर्जेराव देसाई, सुरेश कालेकर, सचिन देसाई, फिलीप लोबो, यशवंत कोडक, पांडू वांद्रे, कृष्णा वरेकर, एकनाथ फगरे, पुंडलिक देसाई, राजाराम जाधव आदींसह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.










