विशेष प्रतिनिधी|मुंबई:
मुंबई आणि अलिबागकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान धावणारी प्रसिद्ध प्रवासी बॉट आणि लॉंच सेवा आगामी २६ मे पासून पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात अरबी समुद्रात निर्माण होणारे वादळी वारे आणि खवळलेल्या लाटांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महाराष्ट्र सागरी मंडळाने हा वार्षिक निर्णय घेतला आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून दरवर्षी सेवा स्थगितदरवर्षी मान्सूनच्या आगमनापूर्वी समुद्रातील पाण्याची पातळी आणि वाऱ्याचा वेग वाढतो. अशा परिस्थितीत लहान प्रवासी बोटी चालवणे अत्यंत धोक्याचे ठरते. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून दरवर्षी साधारण मे महिन्याच्या अखेरीस ही सेवा थांबवली जाते. यंदा २६ मे ही सेवा सुरू राहण्याचा शेवटचा दिवस असेल.
प्रवाशांना आता रस्ते मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. जलवाहतुकीमुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर अवघ्या तासाभरात पार करता येत असल्याने नोकरदार, स्थानिक आणि पर्यटकांची या मार्गाला मोठी पसंती असते. मात्र, २६ मे पासून ही सेवा बंद होणार असल्याने प्रवाशांना आता मुंबई-गोवा महामार्ग किंवा रोहा मार्गे रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागणार आहे.
प्रवासी बोटी बंद होत असल्या तरी भाऊचा धक्का (मुंबई) ते मांडवा दरम्यान चालणारी भव्य ‘एम२एम फेरीज’ (M2M Ferries) रो-रो सेवा मात्र पावसाळ्यातही सुरू राहण्याची शक्यता आहे. ही बोट आकाराने मोठी आणि अत्याधुनिक असल्याने ती खराब हवामानातही चालवण्यास सक्षम असते. मात्र, अतिवृष्टी किंवा तीव्र वादळाच्या दिवशी ही सेवाही तात्पुरती खंडित केली जाऊ शकते.
२६ मे रोजी बंद होणारी ही प्रवासी जलवाहतूक सेवा आता पावसाळा संपल्यानंतर, साधारण सप्टेंबर महिन्याच्या ओहोटीत किंवा गणेशोत्सवानंतर पुन्हा पूर्ववत सुरू केली जाईल.










