मेहकर प्रतिनिधी
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून संघटनेचे प्रमुख दिलीप भैया गायकवाड यांनी प्रशासनाच्या विरोधात ठाम भूमिका घेत उपोषण आंदोलन छेडले आहे.
गावातील गावठाण परिसरातून जाणारा नाला दरवर्षी साचलेले घाण पाणी वाहून नेऊन नदीपात्रात सोडण्याचे काम करतो. मात्र काही शेतकरी बांधवांनी या नाल्यामध्ये कथितपणे अनधिकृत बांधकाम करून पाण्याचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात गावात पाणी साचण्याची आणि नागरिकांना त्रास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात दिलीप भैया गायकवाड यांनी वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी १९ मे रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर २० मेपासून त्यांनी शेलगाव देशमुख येथे आमरण उपोषण सुरू केले.
उपोषणादरम्यान महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहेत.
दरम्यान, मंडळ अधिकारी चनखरे साहेब, तलाठी तिडके साहेब, ढोले साहेब तसेच ग्रामसेवक काळे साहेब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. संबंधित प्रकरणावर उपाययोजना करण्याबाबत लेखी आश्वासन देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला.
मात्र, “तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी येऊन संबंधित बांधकामाची पाहणी करावी आणि तात्काळ स्थगिती द्यावी, त्यानंतरच उपोषण मागे घेण्याचा विचार केला जाईल,” अशी ठाम भूमिका दिलीप भैया गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
या आंदोलनामुळे शेलगाव देशमुख परिसरात प्रशासन आणि ग्रामस्थांचे लक्ष वेधले गेले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









