जालना : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली असून, शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे स्वतःचे ट्रॅक्टर नसल्याने भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर घेऊन नांगरणी, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर आणि पेरणीची कामे केली जात आहेत. मात्र डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे खोळंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सर्व पेट्रोल-डिझेल पंपधारकांना शेतीसाठी अधिकृत कॅन किंवा बॅरलमधून डिझेल पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले आहेत. संबंधित शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरचे आरसी बुक आणि Agristack Farmer ID तपासूनच डिझेल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्यांच्याकडे Farmer ID उपलब्ध नसेल, त्यांची आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि स्वाक्षरी रजिस्टरमध्ये घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र जिल्ह्यात केवळ ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांकडेच ट्रॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित शेतकरी भाड्याने ट्रॅक्टर घेऊन शेतीची मशागत करत आहेत. अशा परिस्थितीत ट्रॅक्टर मालकांकडून “तुम्ही डिझेल आणून द्या, आम्ही मशागत करून देतो,” असे सांगितले जात असल्याने ट्रॅक्टर नसलेल्या शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
यामुळे सातबाऱ्यावरील क्षेत्रफळानुसार ट्रॅक्टर नसलेल्या शेतकऱ्यांनाही डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच या गंभीर प्रश्नात पालकमंत्री Pankaja Munde यांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने डिझेल वितरणात कोणतीही साठेबाजी, काळाबाजार किंवा गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि PESO नियमांनुसार कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.









