परभणी | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असताना, गंगाखेड शहरातील कापसे गल्ली येथील गोपी मुंडे आणि सीमा मुंडे हे दाम्पत्य वृक्षसंवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण करत आहेत. दुष्काळी परिस्थितीतही झाडांना जीवदान देत त्यांनी वृक्षप्रेमाची अनोखी चळवळ उभी केली आहे.
सुमारे अडीच ते तीन वर्षांपूर्वी त्यांनी रस्त्यालगत विविध छायादार व उपयुक्त वृक्षांची लागवड केली होती. सुरुवातीला अनेकांनी “ही झाडं जगणार नाहीत”, “मोठी होणार नाहीत” अशी शंका व्यक्त केली. मात्र गोपी मुंडे यांनी न डगमगता झाडांचे नियमित संगोपन सुरू ठेवले. पाणी देणे, झाडांना आधार देणे, संरक्षणासाठी जाळ्या बसवणे आणि उन्हाळ्यात विशेष काळजी घेणे अशी सर्व कामे त्यांनी स्वतःहून केली.
वृक्षारोपणावेळी काही वृक्षप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. मात्र त्यानंतर झाडांच्या देखभालीची जबाबदारी गोपी मुंडे आणि सीमा मुंडे यांनीच खांद्यावर घेतली. पुरस्थिती असो किंवा तीव्र उन्हाळा, त्यांनी झाडांची निगा राखण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
गोपी मुंडे म्हणाले, “जशी आपण लहान मुलं वाढवतो, तशीच आम्ही या झाडांना वाढवलं आहे. झाडे सावली देतात, प्राणवायू देतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करायला हवे.”
ते पुढे म्हणाले, “ही झाडं फक्त आमची नाहीत, ती संपूर्ण समाजाची आहेत. उद्या कुणाला या झाडाखाली सावली मिळेल, कुणाला शुद्ध हवा मिळेल. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनानेही वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घ्यायला हवा.”
दरवर्षी नवीन रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प त्यांनी केला असून, त्यांच्या या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी दिलेला संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.









