मानवत | प्रतिनिधी :
मानवत शहरातील पाळोदी रोड परिसरातील त्रिमूर्ती नगरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुमारे ६० ते ७० घरांची वस्ती असलेल्या या भागात अद्यापही सिंगल फेज वीज पुरवठा सुरू असल्यामुळे कमी दाबाचा वीज प्रवाह, सतत लाईट जाणे आणि तासन्तास अंधाराचे वातावरण निर्माण होत आहे.
नगरपालिकेचे पाणीपुरवठा सुरू होताच वीज खंडित होणे हे येथील नागरिकांसाठी नित्याचे झाले आहे. नियमितपणे वीज बिल भरूनही महावितरणकडून समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगरातील वीज वसुली जवळपास १०० टक्के असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक वीज जाण्याच्या प्रकारामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. कमी-जास्त व्होल्टेजमुळे घरातील विद्युत उपकरणे खराब होण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित वीज वितरण कार्यालयाकडे तक्रारी केल्या, मात्र परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्रिमूर्ती नगरासाठी तातडीने थ्री फेज वीज पुरवठ्याची व्यवस्था करावी आणि वारंवार होणारे वीज खंडित प्रकार थांबवावेत, अशी मागणी नागरिकांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.
नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









