श्रीगोंदा | प्रतिनिधी
आशिया खंडातील नावाजलेल्या रयत शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेच्या समन्वय समिती सदस्यपदी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य राजेंद्र खेडकर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या या संस्थेतील महत्त्वाच्या पदावर निवड झाल्याबद्दल श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी राजेंद्र खेडकर यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना विक्रमसिंह पाचपुते यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राजेंद्र खेडकर यांनी सातत्याने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वाचा लाभ रयत शिक्षण संस्था च्या भावी वाटचालीस निश्चितपणे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, आजी-माजी नगरसेवक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.








