प्रतिनिधी : बागलाण
राज्यातील शेतकरी सध्या वाढती महागाई, पावसाची अनिश्चितता आणि मागील हंगामातील आर्थिक फटक्यामुळे मोठ्या संकटात सापडला असून खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे, खते आणि शेती औषधांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हरिआण्णा जाधव यांनी शासनाकडे बियाणे व खतांवर तातडीने अनुदान देण्याची मागणी केली आहे.
मागील काही महिन्यांत कांदा, सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांना अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे उत्पादनात घट झाली होती. त्यातच उत्पादित मालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सध्या बाजारात बियाणे आणि खतांच्या दरात मोठी वाढ झाली असून काही भागात व्यापाऱ्यांकडून रोख रकमेची मागणी केली जात असल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती हरिआण्णा जाधव यांनी शासनाने तातडीने बियाणे आणि खतांवर अनुदान जाहीर करावे, पीककर्ज वितरण प्रक्रिया सुलभ करावी तसेच दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.
शेतकरी संघटनांकडूनही सरकारने तातडीने हस्तक्षेप करून खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.










