चंदगड प्रतिनिधी
प्रवीण गणाचारी यांनी ग्रामीण भागातील गॅस वितरणातील कथित गैरव्यवस्था आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू केलेले आमरण उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरू असून, या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोवाड आणि गडहिंग्लज परिसरातील ग्रामीण भागात गॅस सिलिंडरचा पुरवठा जाणीवपूर्वक विस्कळीत केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. वाढत्या महागाईच्या काळात नागरिकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याने काळ्या बाजारातून महागड्या दराने सिलिंडर खरेदी करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवीण गणाचारी यांनी पुरवठा विभागावर गंभीर आरोप करत गॅस वितरणातील भ्रष्टाचाराकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा चुलीच्या धुराचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
किणी येथे “संविधान भवन” उभारण्यासाठी जागा मंजूर करावी, ही आंदोलनाची दुसरी प्रमुख मागणी आहे. संविधान भवन हे सामाजिक प्रबोधन आणि संविधान मूल्यांच्या जतनासाठी महत्त्वाचे केंद्र ठरेल, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
प्रमुख मागण्या
- गॅस वितरणातील गैरव्यवस्थेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई
- ग्रामीण भागातील गॅस टंचाई दूर करून नियमित घरपोच सेवा सुरू करणे
- किणी येथे संविधान भवनासाठी तातडीने जागा मंजूर करणे
सलग पाच दिवस अन्नत्याग केल्यामुळे प्रवीण गणाचारी यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनस्थळी विविध सामाजिक संघटना, युवक, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत पाठिंबा दर्शविला आहे.
आंदोलनकर्त्यांनी मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.











