माळशिरस प्रतिनिधी, फळवणी
राजेंद्र भागवत केदार यांची रयत शिक्षण संस्था यांच्या समन्वय समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ते सध्या यशवंतराव चव्हाण विद्यालय शाखेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संस्थेकडून ही निवड करण्यात आली.
राजेंद्र केदार यांनी विद्यालयाच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पुढाकारातून शाळेच्या इमारतीचे रंगकाम, सीसीटीव्ही कॅमेरे, इंटरॲक्टिव्ह पॅनल, दोन मजली स्वच्छतागृह बांधकाम तसेच विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम सातत्याने राबवले असून सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये जाऊन गुणवत्ता वाढीसाठीही त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
गतवर्षी त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना “रयत निष्ठावान सेवक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता समन्वय समिती सदस्यपदी निवड झाल्याने विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या निवडीबद्दल संस्थेचे सचिव विकास देशमुख, माजी सदस्य दत्तात्रेय एकनाथ आवताडे, स्कूल कमिटी सदस्य ज्योतीराम आवताडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन पाटील, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष राहुल आवताडे तसेच फळवणी पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.










