दारव्हा | प्रतिनिधी
दारव्हा येथे रविवारी (दि. २४ मे २०२६) दुपारी चार वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत व्यक्तीचे नाव स्व. बंडूभाऊ हरिश्चंद्र नेरकर (वय अंदाजे ५५) असे असून ते दारव्हा येथील रहिवासी होते. ते हरिश्चंद्र नेरकर यांचे पुत्र होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील तसेच दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंडूभाऊ नेरकर यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी विहिरीच्या काठावर स्वतःच्या पायातील चप्पल, शिवसेनेचा भगवा शेला आणि चष्मा ठेवून गेल्याचे सांगितले जात आहे.
स्वभावाने मनमिळावू असलेल्या बंडूभाऊ नेरकर यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचा अंत्यविधी सोमवारी सकाळी ११ वाजता दारव्हा येथे पार पडणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.
या दुःखद प्रसंगी शिवसेना दारव्हा तसेच माळी बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र अमरावती यांनी शोक व्यक्त करून नेरकर परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.











