मारेगाव | प्रतिनिधी :
मारेगाव शहरातील दर मंगळवारी भरत असलेल्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. गर्दीचा फायदा घेत चोरटे नागरिकांचे मोबाईल लंपास करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आर्थिक व्यवहारांवरही डोळा
नागरिकांच्या मोबाईलमध्ये असलेल्या डिजिटल पेमेंट अॅप्सचा गैरवापर करून काही प्रकरणांमध्ये फोनपे खात्यातील रक्कम काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका घटनेत संबंधित व्यक्तीने तात्काळ आपले खाते बंद करून उर्वरित रक्कम सुरक्षित केल्याचे सांगितले जात आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या प्रकारांमुळे पोलिस प्रशासनाची गस्त आणि उपस्थिती कितपत प्रभावी आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बाजाराच्या दिवशी विशेष पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांची मागणी
आठवडी बाजारात वाढती गर्दी लक्षात घेऊन मोबाईल चोरट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करावे, तसेच संशयितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.










