प्रतिनिधी :
केशवनगर–खराडी पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि दैनंदिन गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या प्रलंबित कामाविरोधात आज स्थानिक नागरिकांनी भव्य ठिय्या आंदोलन करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रशासनाकडून 20 दिवसांचे आश्वासन
आंदोलनस्थळी पालिका प्रशासन व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत पुलाचे काम पुढील 20 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नागरिकांनी केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्ष काम पूर्ण होणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका घेतली.
तातडीच्या बैठकीची मागणी
यावेळी सन्माननीय आयुक्त, महापौर, बांधकाम विभागाचे सभापती, संबंधित अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी, स्थानिक नगरसेवक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांची तातडीची संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच पुलाचे काम 15 ते 20 दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, असा आग्रह धरण्यात आला.
आंदोलनकर्त्यांचा इशारा
जर पुढील 20 दिवसांत पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर महापौर व आयुक्त यांच्या समोर पालिका सभागृहात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
नगरसेवकांचे ठाम मत
“नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील. यासाठी मला माझ्या नगरसेवक पदावरून हटवले तरी चालेल,” अशी ठाम भूमिका नगरसेवक अजित दत्तात्रय घुले यांनी यावेळी व्यक्त केली.










