परळी | प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागापूर ग्रामपंचायतीची परळी तालुक्यातून द्वितीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासन, लोकसहभाग आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे नागापूर ग्रामपंचायतीला हा सन्मान मिळाला आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. गावातील रस्ते, नाल्या आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवक आणि ग्रामस्थांनी संयुक्त सहभाग नोंदविला. “माझे गाव स्वच्छ गाव” या अभियानामुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली.
महिलांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत घरोघरी कचराकुंडी वाटप, कचरा संकलन आणि घंटागाडी व्यवस्थापनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. यामुळे गावात स्वच्छतेचा आदर्श निर्माण झाला.
याशिवाय ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, अभ्यासाचा भोंगा, तसेच गरजू रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली. अभ्यासाच्या भोंग्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्येही जनजागृती वाढली आहे.
नागापूर ग्रामपंचायतीच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात परळी तालुक्यातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे.
या यशाबद्दल भारतीय दलित पँथरचे परळी तालुका अध्यक्ष तथा झाशीची राणी लक्ष्मीबाई सामाजिक प्रतिष्ठानचे माणिकराव बनसोडे यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, युवक व ग्रामस्थांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







