जिल्हाभर कठोर कारवाईची मागणी; अन्यथा विद्यार्थी-पालकांचा विराट मोर्चा
इंदापूर | प्रतिनिधी
राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीमुळे तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत जिल्हाभरात सुरू असलेल्या अवैध अमली पदार्थ विक्रीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास विद्यार्थी, पालक, शेतकरी आणि नागरिकांचा विराट मोर्चा जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयावर काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
याबाबत शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश (तात्या) बालवडकर, बाबासाहेब झगडे तसेच इंदापूर तालुका अध्यक्ष सुखदेव जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यासारख्या शिक्षणनगरी जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थी, तरुण आणि समाजव्यवस्थेवर होत आहे. खून, चोरी, दरोडे, अपहरण, गँगवॉर आणि युवकांमधील वाढते वाद यामागे अमली पदार्थांचे वाढते सेवन हे गंभीर कारण ठरत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
“शहरासह ग्रामीण भागात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांची माहिती स्थानिक यंत्रणांना असूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे,” असा आरोप संघटनेने केला. तसेच या अवैध व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याने कारवाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची शंकाही व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकरी संघटनेने पोलिस प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम देत जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रीचे संपूर्ण उच्चाटन करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शेतकरी व नागरिकांचा मोठा मोर्चा जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयावर धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
“आज अमली पदार्थांवर कठोर कारवाई झाली नाही, तर उद्या संपूर्ण तरुण पिढी व्यसनाधीन होण्याचा धोका निर्माण होईल. ही केवळ कायद्याची लढाई नसून समाज आणि भविष्यातील पिढी वाचविण्याची लढाई आहे,” अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.







