जानेफळ | प्रतिनिधी :
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर होणारी विनाकारण गोवंश हत्या तात्काळ थांबवावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने जानेफळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गोवंश हत्या ही भारतीय संस्कृती, पर्यावरण, शेती व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधानाच्या कलम ४८ नुसार राज्यावर गोवंश संरक्षणाची जबाबदारी आहे. तसेच कलम ५१(अ)(ग) अंतर्गत प्रत्येक नागरिकाने सजीव प्राण्यांविषयी करुणा बाळगणे हे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० नुसार गोवंश हत्या हा दंडनीय गुन्हा असल्याचेही संघटनेने नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाने ‘स्टेट ऑफ गुजरात विरुद्ध मिर्झापूर मोती कुरेशी कसाब’ प्रकरणात गोवंश संरक्षण हे सार्वजनिक हिताचे असल्याचे स्पष्ट केले असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी गोवंश हा भारतीय कृषी संस्कृतीचा कणा असून पर्यावरण, सेंद्रिय शेती आणि मानवी आरोग्यासाठी त्याचे संरक्षण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा आणि महात्मा गांधी यांनीही गोरक्षणाला महत्त्व दिल्याचे नमूद करण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात काही ठिकाणी होणाऱ्या गोवंश हत्येमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक डॉ. मयूर करे, प्रखंड संयोजक महेश सवडतकर, धीरज ढवळे, गोपाल महाले, विजू काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







