डीएपी-युरिया टंचाई, पिक विमा, वीज व डिझेल प्रश्नांवर यवतमाळात काँग्रेसचे आंदोलन
सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी :
यवतमाळ | दि. २६ मे (मंगळवार)
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या डीएपी व युरिया खतांच्या कृत्रिम टंचाई, बोगस खते-बियाणे-कीटकनाशकांचा वाढता सुळसुळाट, रखडलेला पिक विमा, वाढते पेट्रोल-डिझेल दर तसेच अपुरा व विस्कळीत वीजपुरवठा या गंभीर प्रश्नांवर आज यवतमाळ शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्रमक ट्रॅक्टर-डबकी मोर्चा काढण्यात आला.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षाच्या विविध सेल व आघाड्यांच्या वतीने या भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चाची सुरुवात यवतमाळ शहरातील मेडिकल चौक, दोन पंजा येथून करण्यात आली. त्यानंतर लाठीवाला पेट्रोल पंप मार्गे संविधान चौक, दत्त चौक आणि महात्मा ज्योतिबा फुले स्मारक परिसरातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ट्रॅक्टर, डबकी आणि जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण शहराचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देणे, शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज सुरळीत सुरू करणे, सोयाबीन, कापूस व तूर पिकांचा रखडलेला पिक विमा मंजूर करणे, डीएपी व युरिया खतांचा पुरेसा पुरवठा करणे, बोगस खते-बियाणे-कीटकनाशकांवर कठोर कारवाई करणे, इंधन दरवाढ कमी करणे तसेच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी राज्य शासनावर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनीही सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.
या मोर्चात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश भिसणंकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. बबलू उर्फ अनिल देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, विरोधी पक्षनेत्या वैशाली सवाई, स्वाती येंडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, युवक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
“शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.











