पुणे प्रतिनिधी
पुणे–शिरूर महामार्गावरील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे ते शिरूर दरम्यान उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वांत मोठ्या उन्नत (Elevated) महामार्गाच्या कामाला अखेर अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भविष्यात प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.
सध्या पुणे–नगर महामार्गावर विशेषतः खराडी, वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी वसाहतींमध्ये मोठी वाढ झाल्याने या मार्गावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी नागरिकांना दररोज तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागत होते. आता या उन्नत महामार्गामुळे या समस्येवर मोठ्या प्रमाणात तोडगा निघणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत पुणे ते शिरूर दरम्यान तब्बल ५३.४ किलोमीटर लांबीचा सहापदरी महामार्ग उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये सुमारे ३५.१२ किलोमीटरचा उन्नत उड्डाणपूल असणार असून, हा देशातील सर्वांत लांब Elevated Highway म्हणून ओळखला जाणार आहे. या मार्गामुळे पुणे ते शिरूर प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होऊन अवघ्या ४५ मिनिटांत प्रवास पूर्ण करणे शक्य होणार आहे. तसेच अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.
या प्रकल्पातील सर्वांत विशेष बाब म्हणजे रामवाडी ते वाघोली दरम्यान उभारण्यात येणारा दुमजली (Double Decker) उड्डाणपूल. सुमारे ११.६ किलोमीटर लांबीच्या या आधुनिक संरचनेच्या पहिल्या स्तरावर वाहनांची वाहतूक होणार असून दुसऱ्या स्तरावर मेट्रो धावणार आहे. त्यामुळे भविष्यात पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही मोठी गती मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी अंदाजे ७,३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गाच्या बांधकामाची जबाबदारी ‘वेलस्पन’ कंपनीकडे देण्यात आली असून, पुढील चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे–शिरूर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाल्याने रस्ते रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादन करणे अत्यंत कठीण बनले होते. त्यामुळे विद्यमान महामार्गावरच उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार असून वाहतूक व्यवस्थाही अधिक सक्षम होणार आहे.
दरम्यान, पुणे आणि मराठवाडा यांच्यातील दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भविष्यात औद्योगिक विकास, व्यापार, रोजगार आणि प्रवासाच्या दृष्टीने हा महामार्ग गेमचेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.











