ऐन उन्हाळ्यात वाढलेल्या कमालीच्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना, अनेक भागांत रोजच वीजपुरवठ्याचा सततचा लपंडाव सुरू असल्याने वीजग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजसेवेचा फटका घरगुती ग्राहकांसह व्यापारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही बसत आहे.
वीजग्राहकांना सुरळीत सेवा देण्यात अपयशी ठरत असतानाच, महावितरणकडून पेपरलेस व कॅशलेस व्यवहारांसारखे सामान्य, अडाणी ग्राहकांना न समजणारे नियम कार्यान्वित केले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांना ऑनलाईन व्यवहारांची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच, मागील वीजबिल भरून ४५ ते ५० दिवस उलटल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “एकीकडे सुरळीत सेवा मिळत नाही, तर दुसरीकडे कठोर नियम लादले जात आहेत,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
याबाबत बोलताना काही नागरिकांनी शासनव्यवस्थेवरही तीव्र टीका केली. “लोकशाही राज्याच्या नावाखाली हुकूमशाही व्यवस्थेकडे वाटचाल सुरू असून, सामान्य जनतेची सर्वच क्षेत्रांत पिळवणूक होत आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, “अन्यायाविरोधात सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवला नाही, तर ही मनमानी आणि अनागोंदी व्यवस्था कायम राहील. ‘तुम लढो… हम कपडे सांभालेंगे!’ ही जनतेची उदासीन मानसिकता बदलली नाही, तर ही हुकूमशाही पद्धतीची व्यवस्था अधिकच बळकट होत जाईल,” असेही मत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, सततच्या वीजखंडित प्रकारामुळे नागरिकांनी महावितरणने तातडीने योग्य नियोजन करून अखंडित वीजपुरवठा करावा, तसेच सर्वसामान्य ग्राहकांना समजेल अशा सुलभ पद्धतीने सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.











