| प्रतिनिधी अमर पठारे
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या वडापाव आणि समोसाच्या दरात मोठी वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. रोजच्या धावपळीमध्ये रेल्वे स्टेशनवरील खाद्यपदार्थांवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांमध्ये या दरवाढीमुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन परिसरात मिळणाऱ्या वडापावचा दर ₹13 वरून थेट ₹20 करण्यात आला आहे. तर समोसाचा दर ₹12 वरून ₹20 पर्यंत वाढवण्यात आला आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबईतील लाखो नागरिक दररोज लोकल रेल्वेने प्रवास करत असतात. सकाळच्या गर्दीत आणि कामाच्या धावपळीत अनेक जण स्टेशनवरील वडापाव, समोसा आणि इतर पदार्थांवर अवलंबून असतात. मात्र आता वाढलेल्या दरांमुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात आणखी वाढ होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, विक्रेत्यांकडून कच्च्या मालाचे वाढलेले दर, गॅस सिलिंडर खर्च, वाहतूक खर्च आणि इतर आर्थिक कारणांमुळे दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या स्पष्टीकरणाने प्रवाशांचे समाधान झालेले नाही.
प्रवाशांनी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त करत “आधीच महागाईने नागरिक त्रस्त आहेत, त्यात आता खाण्याचे पदार्थही महाग झाल्याने सामान्य माणसाने जगायचे कसे?” असा सवाल उपस्थित केला आहे.
या निर्णयामुळे मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर दिवसभर चर्चा रंगली असून सर्वसामान्य प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.










