“संतुलित खत वापर जागरूकता अभियान”
खतांचा संतुलित वापरामुळे पिकांचे उत्पादन वाढेल व जमिनीचे आरोग्य सुधारेल
कृषी विज्ञान केंद्र, धुळे व कृषी विभाग, जिल्हा परिषद, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यातील घाऊक खत विक्रेते, बियाणे वितरक व कृषी निविष्ठा संबंधित विविध कंपनी प्रतिनिधी यांच्यासाठी संतुलित खत वापर जागरूकता अभियानांतर्गत एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमास डॉ. बबनराव इल्हे (सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, धुळे) अध्यक्ष म्हणून लाभले. श्री. सुरज जगताप (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे), श्रीमती कावेरी राजपूत (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे), डॉ. दिनेश नांद्रे (कार्यक्रम समन्वय, कृषी विज्ञान केंद्र, धुळे), डॉ. अतिश पाटील (मृदा शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, धुळे), श्री. भास्कर जाधव (मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे), श्री मानसिंग गिरासे (अध्यक्ष, जिल्हा डीलर असोसिएशन, धुळे), कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील, श्री. रोहित कडू, श्री. जगदीश काथेपुरी, श्रीमती अमृता राऊत, डॉ. धनराज चौधरी, तसेच श्री. अरुण तायडे, श्री. सूर्यवंशी आदी कृषि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. दिनेश नांद्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संतुलित खत वापर जागरूकता अभियानाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. येणाऱ्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट आहे. त्या अनुषंगाने पेरणीचे नियोजन, सिंचन व खतांचे व्यवस्थापन, वाणांची निवड याबद्दल विचार व्यक्त केले.
डॉ. बबनराव इल्हे यांनी अध्यक्षीय भाषणात रासायनिक खातांना असलेले विविध जैविक आणि सेंद्रिय खतांच्या पर्यायांबद्दल विचार मांडले. रासायनिक खतांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी जैविक व सेंद्रिय निविष्टांचा वापर वाढवने गरजेच आहे अस ते म्हणाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ उत्पादित निविष्टांचा वापर व विक्री करावी असे आवाहन उपस्थितांना केले.
श्री. सुरज जगताप यांनी रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच आधुनिक शेतीसाठी स्मार्ट उपाय म्हणजे महाविस्तार ॲप बद्दल माहिती दिली. तसेच महाविस्तार ॲपचे फायदे सांगून त्याचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन केले.
डॉ. अतिश पाटील यांनी खतांचा संतुलित वापर याविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. माती परीक्षण अहवालानुसार सेंद्रिय खते (३५-४०%), जैविक खते (२०-२५%) व रासायनिक खते (४०-४५%) या प्रमाणात वापरल्यास पीक उत्पादन चांगले येईल, खर्च कमी होईल तसेच जमिनीची गुणवत्ता अबाधित राहील यावर भर दिला.
डॉ. पंकज पाटील यांनी विविध जैविक खते व जैविक कीडनाशके यांच्या विषयी शास्त्रीय माहिती दिली. कापूस, मका, सोयाबीन ई. पिकांचे किड-रोग व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. जैविक खतांच्या वापरामुळे रासायनिक खतांची २० ते २५ टक्के पर्यंत बचत होऊ शकते असेही सांगितले.
श्री. भास्कर जाधव यांनी भाषणामध्ये बियाणे विक्रेत्यांनी साथी पोर्टल द्वारेच शेतकरी बांधवांना बियाणे विक्री करावी. तसेच खत विक्रेत्यांनी इपिस मशीनद्वारे शेतकऱ्यांना अनुदानित खतांची विक्री करावी असे आवाहन केले.
मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या खतांचा संतुलित वापराविषयीच्या भित्तीपत्रकाचे वितरण करण्यात आले.
एक दिवशीय कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रासाठी डॉ. अतिश पाटील, डॉ. दिनेश नांद्रे, डॉ. पंकज पाटील, श्री. भास्कर जाधव, श्री. अरुण तायडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच हिरवळीचे खते, जैविक खते, माती परीक्षण, खते देण्याचा शास्त्रीय पद्धती ई. विषयावर कृति प्रात्येक्षिक उपस्थितांना दाखवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतिश पाटील यांनी केले. तर आभार डॉ. पंकज पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये श्री. बाळू वाघ, श्री. रमेश शिंदे, श्री. कुमार भोये, श्री. मधुसूदन अहिरे, श्री. कुणाल राजळे, श्री. जीवन राणे, इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास धुळे जिल्ह्यातील घाऊक खत विक्रेते, बियाणे वितरक व कृषी निविष्ठा संबंधित विविध कंपनी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








