खान्देशी अस्मितेचा विजय; अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीच्या लढ्याला आंतरराष्ट्रीय पाठबळ
| प्रतिनिधी अमर पठारे
खान्देशच्या मातीत रुजलेली आणि लाखो लोकांच्या बोलीत जिवंत असलेली अहिराणी भाषा आता थेट जागतिक पातळीवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून युनोच्या युनेस्को संस्थेने अहिराणी भाषेची अधिकृत दखल घेत गौरवपत्र पाठविले आहे. त्यामुळे संपूर्ण खान्देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जगातील विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्यासाठी कार्य करणाऱ्या युनेस्को संस्थेने अहिराणी भाषेच्या जतनासाठी सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, “पहिले विश्व अहिराणी सम्मेलन” आणि अहिराणी साहित्यिकांच्या चळवळीचीही नोंद घेण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आणि अनेक अहिराणी साहित्यिक गेल्या अनेक वर्षांपासून अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने लढा देत आहेत. या लढ्याला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याने अहिराणी भाषेच्या भविष्यासाठी नवी आशा निर्माण झाली आहे.
उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले की, “युनेस्कोने घेतलेली ही दखल म्हणजे संपूर्ण खान्देशासाठी अभिमानाची बाब आहे. अहिराणी ही फक्त बोली नसून ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे.”
दरम्यान, केंद्र सरकारचे भारतीय बोलीभाषा संवर्धन कार्यालय बंगळुरू येथे कार्यरत असून त्या कार्यालयाच्या अधिकारी श्रीमती काटजू यांनीही अहिराणी सम्मेलनाची विशेष नोंद घेतली आहे.
अहिराणी भाषेतील लोककथा, भारुडे, ओव्या, लोकगीतं आणि ग्रामीण संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आता नव्या जोमाने प्रयत्न सुरू होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
“एक भाषा… एक अस्मिता… एक संघर्ष…”
अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सुरू असलेली चळवळ आता अधिक वेगाने पुढे जाणार असून खान्देशातील तरुणांमध्येही याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.







