“बांबोळीत सिंधुदुर्गचा रुग्ण बरा होऊनच जाणार” – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांची ग्वाही*
अतुल बंगेंच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक; गोव्यातील आयुष हॉस्पिटलचा सिंधुदुर्गकरांना दिलासा
कुडाळ प्रतिनिधी :- गोवा आणि सिंधुदुर्ग हे नातं केवळ सीमेपुरतं नाही, तर माणुसकीचं आहे. सिंधुदुर्गातून बांबोळी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या एकाही रुग्णाची गैरसोय होऊ देणार नाही, असा दिलासा केंद्रीय वाणिज्य व ऊर्जा राज्यमंत्री ना. श्रीपाद नाईक यांनी दिला आहे. रुग्णसेवेसाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांनी पणजी येथे ना. नाईक यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली.
सिंधुदुर्गातून दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे येत असतात. अनेकदा गंभीर अवस्थेतील रुग्ण अतुल बंगे यांच्या माध्यमातून थेट ना. श्रीपाद नाईक यांच्याशी संपर्क साधतात. “बांबोळीत पेशंट आला की बरा होऊनच जाणार, हा विश्वास जनतेत निर्माण झाला आहे आणि तोच विश्वास आपल्याला कायम ठेवायचा आहे,” असे भावनिक उद्गार ना. नाईक यांनी यावेळी काढले.
“गेली अनेक वर्षे गोवा आणि सिंधुदुर्ग यांचं आपुलकीचं नातं आम्ही जपलं आहे. अतुल बंगे हे कायम माझ्या संपर्कात असतात. पदरमोड करून, निस्वार्थीपणे रुग्णसेवेसाठी धडपडणारा कार्यकर्ता सिंधुदुर्गात आहे हे पाहून लोकप्रतिनिधी म्हणून मीही सहकार्याचा हात देणं माझं कर्तव्य समजतो,” अशा शब्दांत ना. नाईक यांनी बंगेंच्या कार्याचा गौरव केला.
धारगळच्या आयुष हॉस्पिटलचा सिंधुदुर्गला फायदा
ना. नाईक पुढे म्हणाले, “मी आयुष मंत्री असताना गोव्यात धारगळ येथे आयुष आयुर्वेद महाविद्यालय उभे केले. आज तिथे केवळ दहा रुपयांत आयुर्वेदिक औषधे आणि उपचार दिले जातात. याचा सर्वात जास्त फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना होत आहे.” सिंधुदुर्गातही आयुष ओपीडी सुरू करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या भेटीबद्दल अतुल बंगे यांनी ना. श्रीपाद नाईक यांचे मनापासून आभार मानले. गोव्यातील आरोग्य सुविधा सिंधुदुर्गवासीयांसाठी कायम खुल्या ठेवल्याबद्दल जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे.











