प्रदीप ताजने
पातुर ग्रामीण प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील
सावरगाव आणि पाडशिंगी येथील प्रलंबित जनसमस्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत कामांचे लेखी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अनेक महिन्यांपासूनचे प्रश्न प्रलंबित
सावरगाव येथे अनेक दिवसांपासून संत सेवालाल महाराज विद्यालयासमोर अतिरिक्त ६३ केव्ही (63 kv) डीपीची गरज होती. कमी व्होल्टेजमुळे नागरिकांना उन्हाळ्यात लाईट, कुलर आणि फॅन वापरताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच पाडशिंगी गावात संत सेवालाल महाराज मंदिरावरून आणि लोकवस्तीवरून गेलेली धोकादायक वीज वाहिनी गावाबाहेरून स्थलांतरित करण्याची मागणी होती. यासोबतच गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली अकोला-पाडशिंगी-पांगरताटी ही बससेवा पूर्ववत सुरू करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांची होती. सस्ती येथील महावितरण कार्यालयाकडून शासनाकडे याचे प्रस्तावही पाठवले होते, मात्र अनेकदा निवेदने देऊनही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष होता.
पालकमंत्री कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
प्रशासकीय अनास्थेला कंटाळून अखेर २२ मे २०२६ रोजी समस्त पाडशिंगी आणि सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन आणि आंदोलन मागे
आंदोलनाची तीव्रता पाहून पालकमंत्री आकाश फुंडकर यांचे स्वीय सहाय्यक (PA), महावितरणचे अकोला प्रमुख सपकाळ आणि पातूरचे कार्यकारी अभियंता रंगारी यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. या प्रश्नांवर पालकमंत्री फुंडकर यांच्याशी तातडीने संवाद साधून, ‘आजपासूनच संबंधित कामांना सुरुवात केली जाईल’
अशा आशयाचे लेखी पत्र प्रशासनाकडून आंदोलकांना देण्यात आले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेतले. “हा विजय माझा नसून सावरगाव आणि पाडशिंगी येथील सर्व कष्टकरी ग्रामस्थांचा आहे,” अशी भावना निलेश कापकर यांनी विजयानंतर व्यक्त केली.
ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
या आंदोलनात प्रमुख उपस्थिती रामेश्वर सावंत यांची होती. तसेच सावरगाव येथून काशीराम आडे, शंकर जाधव, सागर लाड, गोपाल बोरकर, राहुल पायघन, देविदास चोंढकर, अमोल राठोड, रामधन जाधव, समाधान राठोड, सचिन जाधव तर पाडशिंगी येथून नाईक श्रीचंद पवार, सरपंच प्रवेश सरकटे, गजानन सरकटे, दामोदर राठोड, पांडुरंग चव्हाण, धोंडू चव्हाण, विठ्ठल जाधव, नेमिचंद चव्हाण, संतोष चव्हाण, विनोद चव्हाण, जयसिंग राठोड, पंजाब राठोड, मूलचंद राघो राठोड, मूलचंद सवाई राठोड, दामोदर पवार, मिलिंद सरकटे यांच्यासह दोन्ही गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











