प्रदीप ताजने
पातुर ग्रामीण प्रतिनिधी
आलेगाव:
येथील परिसरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत टँकरद्वारे पाणी वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. “सेवा हीच आमची ओळख” आणि “कामं बोलतंय कामं” या ब्रीदवाक्याला जागत कापकर यांनी हा कौतुकास्पद उपक्रम सुरू केला असून, यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या आलेगाव परिसरात पाण्याची अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाण्यासाठी स्थानिक महिलांना रात्री उशिरापर्यंत भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र होते. नागरिकांची हीच अडचण आणि विनंती लक्षात घेऊन निलेश कापकर यांनी सामाजिक बांधिलकीतून हा निर्णय घेतला. सद्यस्थितीत रात्री १२ वाजता सुद्धा पाण्याअभावी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या दारापर्यंत टँकरद्वारे मोफत पाणी पुरवले जात आहे. नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे आज रात्रभर हे पाणी वाटप सुरूच राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यकर्ते किरकोळ जखमी
हा पाणी पुरवठा सुरू असताना एक दुर्घटना टळली. टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी गेले असताना समाधान काका गवळी यांचा शेत परिसरात अचानक पाय घसरला आणि ते टँकरवरून खाली पडले. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याची माहिती समोर आली आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन ढोणे, नाजीम भाई, सखाराम लहामगे, शेपी भाई, शंकर लहामगे, सागर चांगले, केशव लहामगे यांसह परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलेश कापकर यांच्या या संकटसमयी धावून येण्याच्या वृत्ती बद्दल संपूर्ण आलेगाव परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.











