रुटी-इमनगाव तलावाने गाठला तळ; पाणीटंचाईचे गडद सावट
केवळ १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक;
(प्रतिनिधी) :- शशिकांत जरांगे
आष्टी तालुक्यातील रुटी-इमनगाच तलावातील पाणीसाठ्यात प्रचंड घट झाली असून, तलावाने आता अक्षरशः तळ गाठला आहे. या तलावावर अवलंबून असलेल्या कासारी आणि मुर्शदपूर परिसरासाठी आता केवळ १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
त्यामुळे आगामी काळात पाणीपुरवठा अत्यंत विस्कळीत होण्याची चिन्हे असून, ऐन उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुटी-इमनगाव तलावातून कासारी आणि मुर्शदपूर या भागाला प्रमुख पाणीपुरवठा केला जातो.
मात्र, सध्या तलावातील पाण्याची पातळी अत्यंत खालावली आहे. उन्हाळ्याची वाढती तीव्रता आणि पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे तलावात जेमतेम १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
राहिला आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन पाहता,
इथून पुढच्या काळात या भागातील नागरिकांना नळाद्वारे केवळ एकच वेळ पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राम स्थांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
या भीषण पाणीटंचाईबाबत माहिती देताना सरपंच अशोक मुळे यांनी वस्तुस्थिती मांडली. ते म्हणाले, तलावातील सध्याची
परिस्थिती चिंताजनक आहे. आपल्याकडे केवळ १५ दिवस जाईल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यावर आता मोठ्या मर्यादा येणार आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट ओळखून प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नागरिकांना असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे की, पिण्याचे पाणी अत्यंत काटकसरीने आणि जपून वापरावे. गाड्या धुणे, अंगणात सडा मारणे किंवा इतर गैरसोयीच्या कामांसाठी पिण्याचे पाणी वाया घालवू नये. निसर्गाची साथ मिळेपर्यंत उपलब्ध पाण्याचा थेंब न थेंब जपणे ही आता काळाची गरज बनली आहे. वेळीच पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येऊ शकते.











