निलेश दाभाडे| नांदुरा प्रतिनिधी
शेंबा बु. — शेंबा ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांसाठी आयुष्यमान भारत व वंदना कार्ड वाटप मोहीम सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे गरजू व गरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
या मोहिमेदरम्यान प्राथमिक आरोग्य सेवक प्रदीप झनके, प्रतिभा बाजोडे, भारती विठ्ठल दाडगे तसेच आशा वर्कर उपस्थित होत्या. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
काही दिवसांपूर्वी आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी नागरिकांकडून सुमारे अडीचशे रुपये आकारले जात होते. मात्र आता ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे पात्र लाभार्थ्यांना हे कार्ड मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. पंचायत समिती नांदुरा यांच्या मार्गदर्शनाखाली शेंबा येथे विशेष मोहीम राबवून नागरिकांची कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच विजय इगळे, ग्रामसेवक ए. एम. काकडे ग्रामपंचायत लिपिक निलेश दाभाडे तसेच ग्रामपंचायत शिपाई ऋषिकेश तायडे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
आयुष्यमान भारत व वंदना कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळत आहे. अनेक लाभार्थ्यांची कागदपत्रे प्रलंबित असल्याने त्यांना घरपोच लाभ मिळावा, यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
या मोहिमेमुळे शेंबा परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून अधिकाधिक पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.










