अंबरनाथ, दि. २९ मे २०२६ : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ आज शुक्रवारी अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चेतन सिंह पवार यांच्यासह अंबरनाथ शहर कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सामान्य नागरिक महागाईमुळे होरपळून निघत असून, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
तहसील कार्यालय तसेच रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात हे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर गॅस सिलेंडरला हार घालून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या महागाईविरोधी धोरणांवर आंदोलनकर्त्यांनी जोरदार टीका केली.
महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.











