तालुका प्रतिनिधी
माहूर (प्रतिनिधी) : माहूर शहरातील वार्ड क्र. ४ मध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात माजी भाजप शहर सरचिटणीस सोनकर प्रमोद अविनाश सोनकर यांनी नगर पंचायत प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, पौराणिक महत्त्व असलेल्या भानुतीर्थ तलाव परिसरात काही दिवसांपूर्वी सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र काम अर्धवट अवस्थेत बंद पडल्याने तलाव परिसरात मातीचे ढिगारे काढून जागा खुली झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसराची स्वच्छता करून तलावाभोवती सुरक्षा कठडे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच जगदंबा हायस्कूललगत असलेला हातपंप गेल्या महिनाभरापासून नादुरुस्त असल्याने नागरिकांना पाणी भरण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. माहूर शहरातील धरमवाडी, बुद्धपुरा, वडरपुरा, कोलामपुरा, मोमीनपुरा, लकडपुरा, बागवान गल्ली, परधान पुरा यासह अनेक भागांतील नागरिक या हातपंपावर अवलंबून आहेत. मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात घाण व झाडाझुडपे वाढल्याने साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय अंगणवाडीची इमारत मोडकळीस आली असून ती कोसळण्याच्या स्थितीत असल्याने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वार्डातील नाल्यांची गेल्या महिनाभरापासून सफाई न झाल्याने नाल्या तुंबून दुर्गंधी पसरली आहे.
या सर्व बाबींची तात्काळ दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात कोणतीही जीवितहानी अथवा अप्रिय घटना घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रतिलिपी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथराव शिंदे, जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार माहूर तसेच आमदार भिमराव केराम यांना देण्यात आल्या आहेत.











