कारखान्यांविरोधात विरोधकांची मोट 💥 विठ्ठलराव लंघे व प्रभाकर शिंदे यांचा घणाघात**
🏵️यंदा तडजोड नाही, निवडणूक लढणारच!🌿
सारथी महाराष्ट्राचा -नेवासा तालुका प्रतिनिधी
श्री. नाथाभाऊ शिंदे पाटील ९८२५०३३४२
नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर आणि मुळा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली. दोन्ही कारखान्यांविरोधातील सर्व गटातील सभासद पहिल्यांदाच एकत्र आल्याचे प्रतिपादन आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले.
प्रस्थापित कारखान्यांच्या विरोधात उभे राहणारे सर्वजण आपले मित्र आहेत. यामध्ये पक्षभेद केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ. लंघे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात विरोधी सभासदांची पहिली संयुक्त बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी भाजपा, शिवसेना, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सभासद उपस्थित होते..
अनेक वर्षे ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक राहिलेले आ. लंघे पाटील आता विरोधी भूमिकेत असून त्यांच्यासोबत पंचगंगा शुगरचे सर्वेसर्वा प्रभाकरकाका शिंदे यांनीही दोन्ही निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत प्रभाकर शिंदे यांनी दोन्ही कारखान्यांच्या विद्यमान व्यवस्थापनावर जोरदार टीका करत कोणत्याही परिस्थितीत निवडणुका बिनविरोध किंवा तडजोड होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. त्यांनी विद्यमान संचालक मंडळावर निशाणा साधला. तालुक्यातील दोन्ही कारखान्यांना ५४ ते ५५ वर्षांचा इतिहास असतानाही प्रत्येकी ५०० ते ६०० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.
आ. लंघे यांनी यावेळी सर्व विरोधी गटांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. बैठकीस शंकरराव लोखंडे, किसनराव गडाख, भारतीय किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भाऊसाहेब वाघ, किरण जाधव, बी. डी. मोटे, दिनकरराव गर्जे, मेजर अरुण फाटके, रामभाऊ खंडागळे, हरीअप्पा तुवर, वाय. डी. कोल्हे, बाबासाहेब पिसोटे, शिवाजीराव मते, आशुतोष डहाळे, राजेंद्र मते, बाळासाहेब पवार, प्रताप चिंधे, आरले, सरपंच ललित मोटे, प्रमोद गजभार उपस्थित होते.
» ऊस नेण्याची गॅरंटी आमचीच
सभासदांचे ऊस नेण्याची गॅरंटी देतो. पंचगंगा कारखान्याप्रमाणे योग्य भाव देऊ. सर्व सभासदांना त्यांच्या मालाचे वजन करण्यास व त्याची पडताळणी करण्यास मुभा राहील. अडचणीच्या काळात कारखान्यांनी सभासदांना कायम त्रास दिला. त्यामुळे यावेळी निवडणुका झाल्याच पाहिजेत, असे स्पष्ट मत प्रभाकरराव (काका) शिंदे यांनी व्यक्त केले.











