ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी..
प्रतिनिधी वर्धा.. शंकर पानबुडे
वर्धा : ओबीसी जनजागृती संघटना, जिल्हा वर्धा यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी वर्धा यांनाही देण्यात आली.
संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतातील ओबीसी समाजाच्या लोकसंख्येची, शैक्षणिक स्थितीची व आर्थिक परिस्थितीची अचूक माहिती उपलब्ध नसल्यामुळे शासनाच्या विविध योजना, आरक्षण, कल्याणकारी धोरणे व विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सामाजिक न्याय, समता व सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
तसेच जातीनिहाय जनगणनेमुळे समाजाची वास्तविक लोकसंख्या, शैक्षणिक प्रगती, आर्थिक परिस्थिती, रोजगारातील सहभाग व सामाजिक स्तर यांची अचूक माहिती समोर येईल. यामुळे शासनाला धोरणात्मक निर्णय घेणे अधिक सुलभ होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ओबीसी जनजागृती संघटनेने केंद्र सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत –
आगामी जनगणनेत ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात यावा.
ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
जनगणनेतील माहिती सार्वजनिक करून सामाजिक न्यायाच्या धोरणांसाठी तिचा उपयोग करण्यात यावा.
ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विविध क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व व कल्याणकारी योजनांचे नियोजन करण्यात यावे.
सामाजिक न्यायाच्या दृष्टीने शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.











