बोगस खत विक्रीचा पाथरीत पर्दाफाश?; शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
जिल्हा परिषद सदस्य अजिंक्य नखाते यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन; कृषी विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह .
पाथरी | प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
खरीप हंगामाच्या तोंडावर पाथरी तालुक्यात बोगस व अनधिकृत खतांची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अजिंक्य नखाते यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवार, दि. २९ मे रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नखाते यांनी म्हटले आहे की, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या
प्रमाणावर खते व बियाण्यांची खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत काही कृषी केंद्रांकडून बोगस, बनावट व अपमिश्रित खतांची विक्री केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याबरोबरच पिकांच्या उत्पादनावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
निवेदनानुसार, छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी फर्टीलायझर कंपनीचे झिंक व बोरॉन दाणेदार उत्पादन हे सिंगल सुपर फॉस्फेट खत असल्याचे भासवून पाथरी येथील ज्ञानेश्वरी कृषी केंद्रामार्फत विक्री करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक शहानिशीत संबंधित कंपनी बोगस असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा नखाते यांनी केला आहे.
यासोबतच तालुक्यातील इतर कृषी केंद्रांमध्येही अशाच प्रकारच्या बोगस कंपन्यांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत का, याची व्यापक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबवून दोषी आढळणाऱ्या विक्रेते, वितरक व संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकाराकडे कृषी विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही अधिकारी व संबंधित कंपन्यांमध्ये संगनमत अथवा लागेबांधे आहेत का, याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. बोगस खतांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
या निवेदनामुळे तालुक्यातील खत विक्री व्यवसाय आणि कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.









