अक्राणी प्रतिनिधी,
, ता. 30 : “पैशावाल्यांचीच पोरं मोठी होतात” हा समाजाचा समज तेलसिंग थावऱ्या पावराने आपल्या जिद्दीने खोटा ठरवला आहे. अतिदुर्गम सावऱ्यादिगर येथे जन्मलेल्या आणि सरदार सरोवरामुळे सावऱ्यादिगरहून शहादा तालुक्यातील जीवननगर येथे पुनर्वसित झालेल्या तेलसिंगने मुंबईत सुरक्षा रक्षक पदाची नोकरी मिळवली आहे.
अत्यंत गरीब परिस्थितीत वडील थावऱ्या सोन्या पावरा व आई बुदीबाई यांनी मोलमजुरी करून, स्वतः अर्धपोटी राहून तेलसिंगला नर्मदा जीवन शाळा, जीवननगर येथेच शिकवले. फाटकी चप्पल, गळक्या छपराखाली कंदिलाच्या उजेडात त्याने शिक्षण पूर्ण केले.
या संघर्षात कणा बनून उभे राहिले ते मामा सुरतान पावरा. घरात आर्थिक चणचण असताना, शाळेची फी भरण्यापासून ते पुस्तके, वह्या घेऊन देण्यापर्यंत मामांनी वेळोवेळी पदरमोड केली.
“भाच्या, तू फक्त अभ्यास कर, पैशाची काळजी करू नकोस”, या एका वाक्याने तेलसिंगला बळ मिळाले. आई-वडिलांइतकाच मामा सुरतान पावरांचा मोलाचा वाटा या यशात आहे. गरिबीच्या वणव्यातही आई-वडील व मामांनी खचू न देता तेलसिंगला शिकवलं.निवडीची बातमी येताच जीवननगर येथील घरी थावऱ्या पावरा उंबरठ्यावरच हमसून रडले. बुदीबाईच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. तेलसिंगने सर्वात आधी मामा सुरतानला फोन लावून कृतज्ञता व्यक्त केली. बातमी ऐकून मामांचेही डोळे पाणावले.
तेलसिंगची खाकी वर्दी पैशाने नाही, तर आई-बापाच्या घामाने, मामा सुरतान यांच्या नि:स्वार्थ मायेने आणि स्वतःच्या अभ्यासाने मिळवलेली आहे. आई-वडील व मामा सुरतान पावरा यांना सॅल्यूट देताना तेलसिंगचे डोळे भरून आले. “गरिबांच्या पोरांना नोकरी लागत नाही, हे खोटं आहे. अभ्यास करा, जिद्द सोडू नका”, हा संदेश त्याने समाजाला दिला आहे.










