धारणी | प्रतिनिधी –
धारणी तालुक्यातील चौराकुंड येथे घडलेल्या वन्यप्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अमरावतीचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनानुसार, सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी मेळघाटातील चौराकुंड जंगल परिसरात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी विषारी पदार्थ टाकल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान वन विभाग व पोलिसांनी संशयाच्या आधारावर अनिल मुन्ना कास्देकर यांना ताब्यात घेतले. मात्र, ठोस पुरावे नसताना इतर ग्रामस्थांनाही संशयाच्या भोवऱ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या तणावपूर्ण परिस्थितीत गावात अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या दगडफेकीत एका महिला वन अधिकाऱ्याला दुखापत झाली. या घटनेचा निषेध करत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी खासदार वानखडे यांनी केली आहे.
तसेच, दगडफेकीच्या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही आदिवासी कुटुंबांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर काढून चौकशी करण्यात येत असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.
या संपूर्ण प्रकरणात सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, तसेच निरपराध ग्रामस्थांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
निवेदन सादर करताना खासदार बळवंत वानखडे यांच्यासोबत रोहित पटेल उपस्थित होते.











